Thursday 15 July 2021

अमृतसर भाग १

अमृतसर डायरी # भाग १

जानेवारी २०२०

माझ्याबद्दल थोडेसे :
मला कधीच टूर ऑपरेटर्स बरोबर फिरायला जायला आवड्त नाही. त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे फिरायचे , ते देतील ते खायचे , त्यांच्या वेळा पाळायच्या , ते देतील त्या हॉटेल मध्ये रहायचे , लौकिक अर्थाने जे प्रसिद्ध आहे ते घाई घाईमध्ये पहायचे आणि घरी यायचे. आणि यासाठी भरपूर पैसे मोजायचे हे मनाला पटत नाही. त्यामुळे माझ्या ट्रिपस मलाच arrange करायला आवड्तात. त्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे वेळेचे नियोजन करता येते. एखाद्या ठिकाणी जास्त वेळ थांबावेसे वाटले तर थांबू शकतो. जिथे हवे तिथे राहू - खाऊ शकतो. हव्या त्या पर्यायाने प्रवास करू शकतो आणि यात मला भरपूर मजा येते . यात पैशांची सुद्धा बचत होते. फिरायला गेल्यावर प्रत्यक्ष फिरण्यात म्हणजे प्रवासखर्च , entry tickets, तिथले लोकल खाणे पिणे यावर खर्च करायला मी अजिबात मागेपुढे पहात नाही पण फिरायला गेल्यावर मला महागड्या हॉटेल वर खर्च करणे पटत नाही. 2star , 3star हॉटेल्स मध्ये जाऊन रहाणे म्हणजे निव्वळ पैसा फुकट घालवणे आहे . रात्रीची शांत झोप आणि सकाळचे प्रातर्विधी हे सोडून आपण त्या खोलीचा काहीही वापर करत नाही मग भरमसाठ भाड्याच्या खोल्या कशाला हव्यात ? टूऱ ऑपरेटर बरोबर जायचे म्हणजे या रहाण्यावर खूप खर्च केलेला असतो .त्यामुळे साधा homestay, किंवा धर्मशाळा असली तरी मला चालते फक्त रहाण्याचे ठिकाण सुरक्षित पाहिजे . पैसे वाचवायचे म्हणून कुठेही राहून चालत नाही . आणि दुसरी गोष्ट म्हणजे देशात कुठेही 2star, 3star हॉटेल बूक केले तर तिथले वातावरण हे सारखेच असते. पण आपण धर्मशाळा , homestay, किंवा छोटी हॉटेल्स try केली तर तिथले वातावरण वेगवेगळे असते. त्या त्या राज्यातील संस्कृतीचा फील असतो.

पंजाब प्रवासाची तयारी :

माझी देशातील बर्यापैकी राज्ये फिरून झाली आहेत . पण पंजाब चा योग अजून आला नव्हता. लहानपणी हरितक्रांती मुळे भूगोलातून या राज्याची ओळख झाली. नंतर चित्रपट , शीख समुदाय बहुसंख्य असलेले राज्य आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भारत पाक सीमेवरचे राज्य म्हणून पंजाब बद्दल उत्सुकता होती. आणि बरेच दिवसात लांब कुठे गेलो नव्हतो म्हणून पंजाब ला जायचे नक्की केले. पंजाब राज्य मोठे आहे आणि बघण्यासारखी खूप ठिकाणे आहेत ; पण माझ्याकडे जास्ती दिवस नसल्यामुळे यावेळी मी फक्त अमृतसर लाच जायचे ठरवले . अटारी बॉर्डर चा बीटिंग रीट्रीट चा कार्यक्रम आणि सुवर्णमंदिर हे खास आकर्षण होते माझ्यासाठी. आई आणि मी असे दोघेच जाणार होतो .

#पुणे ते अमृतसर आणि अमृतसर ते पुणे तिकीट बुकिंग:

फक्त अमृतसर ला जायचे असल्यामुळे पुणे ते अमृतसर आणि अमृतसर ते पुणे अश्या प्रवासाचे नियोजन करायचे होते. वेगवेगळे ट्रॅव्हल ब्लॉग्स , ट्रिप ॲडवासर यावर माहिती घेउन मी अमृतसर मधील प्रेक्षणीय स्थळांची यादी काढली. बऱ्याच जणानी अमृतसर ला फिरायला दोन दिवस पुष्कळ झाले असे लिहिले होते. मी काढलेली प्रेक्षणीय स्थळांची यादी आणि त्या ठिकाणांचे सुवर्णमंदिर पासूनचे अंतर मी गूगल मॅप वर पाहून लिहून काढले आणि प्रत्येक दिवशी आपण साधारण किती ठिकाणे करू शकतो याचा अंदाज बांधला आणि तीन दिवसांचा प्लॅन ( itinary) तयार केला यात आणखी एक दिवस जास्तीचा ठेवला कारण माझ्या सोबत आई असणार होती. अमृतसरच्या थंडीत तिला adjust व्हायला एक दिवस लागू शकतो किंवा अटारी बॉर्डर च्या कार्यक्रमात जर सरकार कडून / सैन्याकडून ऐनवेळी काही बदल झाला ( अभिनंदन वर्थमान ला परत आणायच्या दिवशी बिटिंग रीट्रीट चा कार्यक्रम रद्द केला होता ; सामान्य नागरीकाना त्यादिवशी तिथे प्रवेश नव्हता )तर एक दिवस राखीव ठेवला होता. असे प्रवास सोडून 3+1=4 दिवसांचे नियोजन मी केले . जर या जास्तीच्या दिवसाची गरज लागली नाही तर त्यादिवशी कुठे फिरायचे ह्याचे पण नियोजन केले .

पुणे ते अमृतसर अशी डायरेक्ट ट्रेन नाहीये . पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते अमृतसर असा ब्रेक जर्नी केला तर साधारण ३६ ते ३८ तासांचा प्रवास आहे .
आई सोबत असल्यामुळे मला ट्रेन चा प्रवास टाळायचा होता . एवढा ट्रेनचा प्रवास केल्यावर परत तिथे कमी तापमानात फिरायचे होते. म्हणून मी विमान प्रवास करायचे ठरवले. पण पुणे ते अमृतसर डायरेक्ट फ्लाईट पण नाहीये. मुबंईहून डायरेक्ट फ्लाईट आहे. पण ती सकाळी १०:३० ची आहे म्हणजे त्यासाठी पहाटे लवकर पुण्यातून निघावे लागणार होते. म्हणून मी पुणे ते दिल्ली असा विमानप्रवास करायचा ठरवले. पुण्याहून दुपारी १:३० चे डायरेक्ट विमान आहे ते ०३:४५ ला दिल्लील पोहोचते आणि दिल्लीतून संध्याकाळी ७ ला अमृतसरसाठी ट्रेन आहे . मुम्बई सेंट्रल ते अमृतसर अशी ट्रेन आहे( Train no : 02903) ती संध्याकाळी ७ ला दिल्लीत पोहोचते . तिची तिकीटे मी काढली. येताना पण अमृतसर ते दिल्ली ट्रेन आणि दिली ते पुणे असा विमानप्रवासाची तिकिटे काढली.
हे बूकिंग मी Oct 2019 मध्ये केले आणि प्रवासासाठी Jan 2020 चा पहिला आठवडा निवडला. कारण नोव्हेंबर- डिसेंबर हे थंडीचे महिने टाळायचे होते . तसेच या महिन्यात सुट्ट्या असल्यामुळे बरेच पर्यटक बाहेर पडतात. त्यामुळे सगळीकडे गर्दी असते. सगळीकडे दर जास्त असतात पण जानेवारी मध्ये नाताळ ची सुट्टी संपून शाळा सुरू झालेल्या असतात , थंडी थोडी अवाक्यात असते आणि सीझन संपल्यामुळे रिक्षावाले , लॉजवाले बार्गेनिंग च्या मूड मध्ये असतात . आणि आपल्या इंग्रजी नवीन वर्षाची सुरूवात छान होते.

# प्रवासाची तयारी :
प्रवासाच्या तयारीत सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तिथल्या थंडीचा अन्दाज बांधणे. नेट वरून गेल्या २-३ वर्षांचा हवामानाचा trend बघितला आणि प्रत्येकी हातमोजे , पायमोजे, शाली २ जोड , आणि प्रत्येकी एक स्वेटर घेतला. जानेवारी मध्ये हवामान ३° ते ६ ° च्या आसपास असते .
थोड्र सुके खाणे बरोबर घेतले. एक मोठी बॅग check in luggage मध्ये आणि एक सॅक cabin baggage मध्ये घेतली. क्रेडिट कार्ड , डेबिट कार्ड , ट्रेन ची तिकिटे सर्व सोबत घेतले.
अमृतसर ला उतरायचे कुठे हा प्रश्न होता. नेट वरून एवढे समजले होते की शहर फार मोठे नाहीये. आणि सुवर्ण मंदिरापासून बाकीचे spot जवळ आहेत . मग सुवर्ण मंदिराजवळ च रहायचे मी ठरवले. नेट वर सुवर्ण मंदिराच्या भक्त निवासाबद्दल समजले. तिथले बूकिंग online करता येते . ( www.sgpcsarai.com
) भक्त निवास ला तेथे सराई म्हणतात. पण हे online booking फक्त दोन दिवसांसाठीच मिळते. परत वाढवून मिळते का ते माहित नव्हते. आणि त्यावेळी पाच जणांच्या rooms उपलब्ध होत्या. ज्याची मला गरज नव्हती. त्यामुळे मी काही online booking केले नाही. इथले check in time 1300 hrs & check out time 1200 hrs(noon) आहे . त्याबाबतीत इथे शिस्त आहे. वेळ मागेपुढे झाली तर पूर्ण दिवसाचा charge द्यावा लागतो . आणि इथे फक्त कुटुंब आणि विवाहित जोडप्यानाच जागा देतात .
याशिवाय private rooms देणारे सुद्धा बरेच आहेत. नेट वर सगळी माहिती आहे. room मिळायला अडचण येणार नाही हे कळल्यावर मी तिथे जाऊनच room घ्यायचा विचार केला. क्रमश:

Monday 21 June 2021

नवीन सुरूवात

    कोर्टरूम मध्ये त्याने दिलेला DD हातात घेउन आपल्या लालची डोळ्यानी ती त्याकडे बघत होती. तो तिच्या मागेच उभा होता. DD वरचा आकडा एकदा बघून रक्कम किती आहे हे समजायची बौद्धिक कुवत नसल्याने ती  लहान मुलासारखे एक एक शून्य मोजत खात्री करत होती. त्याला मात्र  गेल्या साडे चार वर्षांच्या घडामोडीमुळे आलेला मानसिक ताण असह्य होत होता. तसेच ही रक्कम गोळा करताना त्याची  आणि त्याच्या आईची झालेली परवड , लोकांकडे पसरावे लागलेले हात , मध्ये आलेल्या सुट्ट्यान्मुळे झालेली घाई , दरम्यान lockdown लागायची भिती या सगळ्या पळापळीमुळे ते दोघेही खूप थकले  होते ; पण ह्या एका दुष्ट चक्रातून सुटका होणार ही  एकमेव दिलासा देणारी गोष्ट होती.
    हे लग्न करताना मुलीच्या घरच्यांची परिस्थिती नाही आणि आपल्या एकुलत्या एक मुलाचे लग्न म्हणून सारा खर्च त्याच्या आईने एकटीने केला होता.आता  आज यातून बाहेर पडण्यासाठी पण त्यालाच  आणि आईलाच  पैसे गोळा करून द्यावे लागले. या देशात मुलगा म्हणून जन्म घेणे हा शाप झालाय. 
    न्यायाधीश महाराजानी दोघाना हा निर्णय घेताना कोणाचा दबाव नाही ना याची खात्री केली. तसेच ती या  रकमेत समाधानी आहे ना ? याची त्यानी तिच्याकडून खात्री केली. आणि शेवटी त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले. 
    जे नाते दोघान्मध्ये कधी निर्माणच झाले नव्हते पण कायद्यामुळे पती पत्नी हा शिक्का बसला होता तो आज न्यायाधीश महाराजांच्या सहीमुळे पुसला गेला. आणि तो  त्याचे  आयुष्य स्वतंत्रपणे जगायला मोकळा झाला.
ही भावना किती सुखकारक आहे याची कल्पना जो कोणी या प्रसंगातून गेलाय त्यालाच समजू शकते. गेली साडे चार वर्षे संयमाची कठोर परीक्षा घेणारी गेली. आयुष्याला पुरतील असे अनुभव देउन गेली. काही नातेवाईक, हितचिंतक, मित्रमंडळी ,  वकील, आपली महान न्यायव्यवस्था, यांची आगळीवेगळी रूपे , तसेच परमेश्वराची कृपा असली तर काय काय होवू शकते याची जाणीव देणारी ही वर्षे होती. 
     त्या दोघांच्या नात्यात काही बिनसले आहे हे जेव्हा पहिल्यांदा  नातेवाईकांना कळले तेव्हासुद्धा  काही जणांकडून इतक्या मिश्र प्रति क्रीया उमटल्या की त्या समजल्यावर त्याला आपण या सर्वाना आपले नातेवाईक म्हणून इतके वर्षे का समजत होतो असे वाटायला लागले. काय झाले आहे हे माहित करून न घेता काही जणानी पैसे देउन मोकळे व्हा असे सल्ले दिले. काहीनी आपल्या कुठल्यातरी खटल्यात आपल्याला किती द्यावे लागले मग त्यामानाने तुम्हाला काहीच द्यावे लागत नाहीये अशी तुलनाही केली. काहीना त्याच्या बाबतीत असे घडले याचा विकृत आनंद पण झाला आणि आता याची मजा बघायची असे ठरवून चेहऱ्यावर दु:खी भाव आणून खोटे सांत्वन केले. काहीनी पाठिमागे त्याच्यात आणि त्याच्या आईत काहीतरी दोष असणार नाहीतर एवढी सोन्यासारखी मुलगी घर सोडून का जाईल? असे तर्क लावले. काहीना मात्र खरोखर वाईट वाटले. "जी काही मदत लागेल ती सांग" असे काहीनी मनापासून सांगितले. त्याला "तुझे सगळे चांगले होइल" असे आशीर्वादही दिले. त्याला आणि त्याच्या आईला या  नातेवाईकांच्या या भूमिका नवीन नव्हत्या. याआधीही असे अनुभव आलेच होते. फक्त आता निमित्त नवीन होते. त्या नातेवाईकांबद्दलचे आपले ठोकताळे बरोबरच आहेत आणि ही लढाई सुद्धा आपल्या दोघानाच लढायची आहे याची जाणीव  वेळेत झाल्याचे  दोघाना त्यातल्या त्यात समाधान होते. आता सुद्धा हा विषय पूर्ण झाल्यावर त्या ठराविक नातेवाईकांच्या काय प्रतिक्रीया येणार याची त्याला कल्पना आहे. "आम्ही म्हणालो होतो ; पैसे द्यावेच लागणार. तेव्हा आमचे ऐकले असते तर कमी द्यावे लागले असते आणि लवकर सुटका झाली असती",  "तरी फार काही द्यावे लागले नाहीत अमक्याच्या तमकीने एवढे मागितले होते", "या दोघाना आमचे ऐकायला नको ; शेवटी मुलाची ४ वर्षे गेली ना फुकट ? " , " शेवटी दिलेच ना एवढे पैसे ? मग कशाला पैसे नाहीत पैसे नाहीत म्हणून रडत होते ?" इत्यादी इत्यादी. 
    न्यायव्यवस्थेत  'वकील' हा महत्वाचा  दुवा आहे . त्याने  आपल्या अशिलाची बाजू कोर्टापुढे मांडून त्याला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करायचे असतात. त्या साठी त्याला अशिलाकडून फी मिळत असते . पण काही वकील असे आहेत  की ते आपल्या अशिलाना बरोबर उलटे सल्ले देतात. त्याचे परिणाम अशिलावर होतात, कोर्ट  अशिलावर नाराज होते . अशिलाची बाजू कोर्टापुढे मांडलीच जात नाही. मग एकतर्फी  काही आर्थिक निर्णय घेतले जातात.त्याचे  वकिलाना काहीच वाटत नाही .अशीलाची आर्थिक परिस्थिती, मानसिक स्थिती याने त्याना काहीही फरक पडत नाही. माणुसकी तर दूरच पण आपले वकील म्हणून असलेले कर्तव्य  सुद्धा  वकील विसरतात .  आपल्या चुकीच्या सल्यामुळे समोरच्याचे काय काय नुकसान होवू शकते याचे त्याना अजिबात भान नसते. आणि आपण वकील आहोत म्हणजे अशीलाने आपल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा. अशीलाने प्रश्न विचारलेले त्याना आवडत नाही.त्याचे फोन उचलले जात नाहीत . अशीलाने आपल्या केस बद्दल अभ्यास केलेला त्याना चालत नाही. आणि आपण मागू तेवढे आणि मागू तेव्हा पैसे त्याने द्यावेत याच त्यांच्या अपेक्षा असतात. बदल्यात आपण काय लायकीच्या सेवा देतोय याची त्याना फिकीर  नसते. या वकीलांच्या चुकीच्या सल्ल्यामुळेच त्याचे नुकसान झाले होते. आपल्या कर्मांपासून कोणाचीच सुटका नसते. वकीलांच्या बाबतीत तर त्यांची कर्मे त्यांची तिसरी पिढी भोगते असे म्हणातात. 
    आता त्याच्यासाठी नवीन आयुष्य सुरू होतेय. साडे चार वर्षांचा अनुभव आयुष्यभर सोबतीला रहाणार आहे. आज त्याच्यासारखे असंख्य पुरूष एकतर्फी कायद्याचे शिकार झाले आहेत. कित्येक जण तुरूंगात आहेत , कित्येकांचे पालक उतारवयात कोर्टाच्या पायऱ्या झिजवत आहेत. कित्येक जण आपल्या पोटच्या गोळ्याचे दर्शन व्हावे म्हणून विनवण्या करत आहेत आणि कित्येक जण असे आहेत ज्याना हा ताण सहन  होत नाही , आई वडिलांचे हाल पहावत नाहीत , समाजाच्या विखारी जीभा असह्य होतात ; ते आत्महत्येचा मार्ग निवडतात. पण त्याची तरी कोणाला फिकीर आहे ? एक पुरूष गेला म्हणून कोणाला काहीच फरक पडत नाही. कारण आपल्याला फक्त महिलांचे सबलीकरण करायचे आहे. असे किती पुरूष रोज जातात. कोणालाही त्याचे काही वाटत नाही. मुळात महिला सबलीकरणाच्या पाशवी उत्साहाच्या नादात समाज पुरूषालाही मन असते, आत्मसन्मान असतो , त्यालाही प्रेमाची , गरज असते , त्यालाही काही अधिकार असतात हेच विसरून गेलोय. पुरूष म्हणजे घाण्याला जुंपलेला बैल झालाय ; काहीही  करून त्याने कुटूंबाच्या सतत वाढत्या गरजा भागवायच्या आणि त्यातच आपले आयुष्य खर्ची पाडायचे. यात कधीही कसूर करायची त्याला परवानगी नाही ; तसे झाले तर लगेच  समाज त्याचे लचके तोडायला तयारच आहे. 
    राज्यकर्त्यांनी विवाह संदर्भातले कायदे इतके एकतर्फी करून ठेवले आहेत की मुली त्याचा एक पैसे मिळवण्याचा मार्ग म्हणून वापर करू लागल्या आहेत. कायद्यांच्या  मूळ उद्देशाला हरताळ फासला जातोय ;पण त्याची दखल  कुठेही घेतली जात नाहीये. आपली काही चूक नसताना केवळ आपण मुलगा आहोत म्हणून आपल्या आयुष्यातील ५ वर्षे मनस्तापाची गेली आणि वर आर्थिक भुर्दंड बसला ही सल त्याच्या मनातून काही केल्या जाणार नाही. महिला सशक्तीकरणाच्या नकली ओझ्याखाली दबलेल्या व्यवस्थेने आज आणखी एक बळी मिळवला.

Monday 1 March 2021

माझी शाळा | शताब्दी वर्ष

#माझीशाळा #फाटकहायस्कूल 

       नव्या नोकरीतल्या सहकार्यांकडून आईला रत्नागिरीतील तेव्हाच्या प्रसिद्ध शाळांची नावे कळली. आणि त्यापैकी एका शाळेत मला प्रवेश मिळावा यासाठी नोकरी सांभाळून आईची धडपड चालू होती. एका प्रसिध्द शाळेने आमची कौटूंबिक परिस्थिती बघून ( चारचौघांसाऱखी  कौटूंबिक पार्श्वभूमी नसल्यामुळे) मला प्रवेश नाकारला होता.  त्यामुळे आई काळजीत होती. बालवाडीचे पहिले वर्ष असेच १-२ शाळेत गेले आणि बालवाडीच्या दुसऱ्या वर्षात मात्र मला 'फाटक हायस्कूल' मध्ये ( प्राथमिक शाळेचे नाव वेगळे आहे ) प्रवेश मिळाला. 
       घरात मला सांभाळण्यासाठी आणि शाळेत पोहोचवण्यासाठी कोणी नाही म्हणून माझ्या आईने शाळेजवळ फ्लॅट घेतला. सकाळी १० वाजले की आई नोकरीवर जाताना  मला घराजवळच्या पतित पावन मंदिरात सोडायची. शाळेची वेळ होइपर्यंत मी मंदिराच्या आवारात रहायचो. वेळ झाली की रस्ता ओलांडून शाळेत जायचो. शाळा सुटली की परत मंदिरात मग तिथे आई नोकरीवरून  आली की तिच्याबरोबर घरी. 
त्यामुळे शाळा , शाळेतले शिक्षक , मित्र , पतित पावन मंदिराच्या आवारातले रहिवासी आणि जवळच असलेले  'जनसेवा ग्रंथालय ' हेच माझे जग होते. आणि या सगळ्यानी माझे बालपण समृद्ध केले. सगळे शिक्षक चांगले भेटले. सर्वांची नावे आठवत नाहीत आणि सर्वांची नावे  लिहिणे शक्यही नाही. प्राथमिक शाळेच्या भावे बाई , घाणेकर बाई , रायकर बाई , नारकर सर , हायस्कूल मधल्या खांचे बाई , नितीन गावकर सर , शेट्ये बाई , प्रभुदेसाई बाई , परीट सर , टिकेकर सर , देवऱूखकर सर , सावर्डेकर सर , कीर सर , भाट्ये सर , सावंत सर , गोगटे सर , भाताडे सर , श्रीखंडे बाई , बोपर्डीकर बाई , मुळ्ये बाई सर्वांची आठवण येते. त्यांच्या तासाच्या गमती जमती  आठवतात. मैदानावरचे खेळ आठवतात. NCC चे भिवरे सर आणि NCC ची दोन वर्षे आठवतात. पांढरे शुभ्र कपडे घालून केलेली दर शनिवार - रविवार ची परेड आठवते. सगळ्या सहली आठवतात. दहावी पर्यंत मी एकही शालेय सहल चुकवली नाही.  २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट साठीची लेझीम ची प्रॅक्टिस आठवते. या शाळेने खूप काही दिले. सगळे शब्दात मांडणे कठीण आहे. 
     आज जो काही मी आहे , जसं आयुष्य जगतोय त्याचे सारे क्रेडिट या शाळेचे , तिथल्या शिक्षकांचे , पतित पावन मंदिरातल्या भगवान लक्ष्मी नारायणाचे आणि तेथील  रहिवाश्यांचे ( त्यानी मला आणि माझ्या आईला प्रत्यक्ष / अप्रत्यक्षपणे खूप आधार दिला ; खरतरं हा स्वतंत्र पोस्ट चा विषय आहे  ) आणि जनसेवा ग्रंथालयातील पुस्तकांचे आहे. चौथी पासून रत्नागिरीतून बाहेर पडेपर्यंत या वाचनालयात मी जायचो. या वाचनानेच माझे वैचारिक जग बदलत गेले.

     आजपासून शाळेचे शताब्दी वर्ष सुरू होतेय. (स्थापना ०१ मार्च १९२२) गुरूवर्य कै. फाटक सर यांच्या संकल्पामुळे शाळा उभी राहिली आणि वटवृक्षाप्रमाणे वाढत जाताना आज वयाची शंभरी गाठतेय.  ज्ञानदानाचे  कार्य हे अभिनव कार्य आहे ते असेच या वास्तूतून अव्याहत पणे येणाऱ्या काळात चालू राहूदे. आणि त्याद्वारे आमच्या सारख्या असंख्य  मातीच्या गोळ्याना योग्य तो आकार मिळू दे या सदिच्छा! 

     लहानपणी आईबरोबर बालवाडीतल्या प्रवेशासाठी गेलेलो असताना ज्या सरानी / बाईनी माझा interview घेतला आणि मला प्रवेश दिला त्यांच्यापासून दहावीचा रीझल्ट काढून देणाऱ्या क्लार्क पर्यंत ज्यानी ज्यानी माझे चांगलेच योजले आणि त्यासाठी आपल्या आयुष्यातील वेळ दिला त्या सर्वांच्या चरणी मनापासून कृतज्ञता. 

- अनिकेत शेटे ( दहावी- अ - २००२ बॅच )
*#माझी_शाळा #फाटक_हायस्कूल #शताब्दी_वर्ष*
Image sources: Facebook groups