Friday 19 April 2024

"दुबई चा पूर : निसर्गाचा अजून एक इशारा"

 "दुबई चा पूर : निसर्गाचा अजून एक इशारा"


    १५ -१६ एप्रिल ला मध्यपूर्वेतील संयुक्त अरब अमिरात या देशातील अबू धाबी , शारजाह  आणि दुबई या शहरात अति प्रचंड पाऊस  पडून पूर सदृश स्थिती झाल्याचे आपण सर्वानी टीव्ही वर पाहिले. जगातील श्रीमंत शहरातील एक शहर आणि जगभरच्या करोडपतींचे आवडते शहर, जगातील दोन क्रमांकाचे व्यस्त विमानतळ असलेले शहर  म्हणून दुबई ची ओळख आहे. "बुर्ज खलिफा" या जगातील सर्वात उंच इमारतीसह , मोठ्या माहामार्गांचे जाळे , चालक विरहीत वहातूकीचे जाळे  , स्मार्ट पोलिस स्थानके , जगभरातील मोठ्या अस्थापनांची कार्यालये, जगातील सर्वात मोठा  सोन्याचा बाजार आणि इतर  विविध प्रवासी आकर्षणांसोबत  एक अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि मानवी जीवनाला सुखकर बनवणारे सुनियोजित असे शहर म्हणून  दुबई शहर जगप्रसिद्ध आहे. 

    पण या कथित सुनियोजित शहराला दोन दिवसांपूर्वी पावसाने इतके झोडपले की तिथे पूर आला आणि २४ तासात निसर्गापुढे या शहराने हात टेकले. जे रस्ते महागड्या गाड्या चालवण्यासाठी प्रसिद्ध होते , जो विमानतळ त्याच्या व्यस्ततेसाठी प्रसिद्ध होता, जे बाजार खरेदी विक्रीसाठी जगप्रसिद्ध   होते तिथे पाणी भरून वहातेय आणि संपूर्ण  शहराचे नियोजन कोलमडले आहे. 



    या पूरामागचे प्राथमिक कारण हे दुबई वापरत असलेले क्लाउड सीडिंग तंत्र (ढगात विविध रस्सायने सोडून कृत्रिम पाऊस पाडणे ) आणि याच दरम्यान ओमान वरून दुबई च्या दिशेने जाणारे एक वादळ यांचा एकेमेकांवर काय परिणाम होइल याचा  अभ्यास न करणे हे  दिले जातेय. पण मूळात अशा कृत्रिम पावसाची गरज दुबईला  का लागते हे समजून घेण्यासाठी या शहराचा विकास कसा आणि कुठल्या परिस्थिती मध्ये  झालाय हे थोडक्यात पहावे लागेल.



    दुबई हे पर्शियन आखातातील पूर्वेकडील अरेबियन द्वीपकल्पातील बंदर आहे. तसेच हा भाग अरेबियन  वाळवंटाचा असून सुरूवातीला दुबई बंदर हे फक्त उत्तरेकडून म्हणजे  इराक आणि इराण कडून येणार्या  आणि दक्षिणेकडून म्हणजे ओमान कडून येणार्या जहाजाना थांबा म्हणून वापरले जात होते. याशिवाय मोत्यांची शेती आणि मासेमारी एवढेच उद्योग इथे चालायचे पण वाढत्या व्यापाराने  पर्शियन आखात आणि अरबी समुद्र यामधील वहातूकीसाठी दुबई बंदराचे महत्व वाढू लागले. आणि हे महत्व लक्षात आलेली  आणि त्यावर आधुनिक दुबई ची मूहूर्तमेढ ठेवणारी व्यक्ती म्हणजे 'शेख रशीद बिन सईद अल मख्तुम'. आपल्या चतुराई ने या व्यक्तीने दुबई ला फ्री ट्रेड सिटी घोषित करून जगभरातल्या व्यापार्याना आकर्षित करायला सुरूवात केली. याचा अर्थ या बंदरात व्यापारी आपल्या मालाची खरेदी विक्री दुबई बंदराला कुठलाही कर न देता करू शकत होते. या सोयीमुळे दुबई बंदराचे नाव जगभर व्हायला सुरूवात झाली. तोपर्यंत दुबई बंदरातून फक्त मोत्यांची निर्यात होत होती. पण या नव्या सवलतीमुळे आंतराष्ट्रीय बाजारात दुबईसाठी नवीन संधी उपलब्ध झाल्या. दुबई मधील पायाभूत सुविधांचा विकास होवू लागला. पुढे ६० च्या दशकात  दुबई मध्ये तेलाचे साठे सापडले आणि दुबई ला एक नवी अर्थिक ताकद मिळाली. शेख रशीद यानी या ताकदीचा फायदा दुबई च्या विकासासाठी केला. रस्ते , शाळा , बॅंक, हॉस्पिटले याशिवाय आंतराष्ट्रीय गुंतवणूकदाराना सोयीसाठी जे जे करता येइल ते दुबई मध्ये केले गेले. यासाठी मोठ्या मोठ्या इमारतींचे बांधकाम दुबई मध्ये सुरू झाले. पश्चिमेला रखरखीत वाळवंट जिथे शेती आणि इतर उत्पादनाची शक्यता कमी आणि पूर्वेला समुद्र जिथे तेलाचे साठे सापडले जे कधीतरी संपणार होते. ह्या मर्यादा लक्षात घेउन  शेख रशीद यानी आपले लक्ष दुबई ला जगभरच्या व्यापार्याना आणि गुंतवणूकदाराना आकर्षित करण्यासाठी दुबई ला एक शिपिंग् हब बनवण्याचे ठरवले. यासाठी दुबई च्या खाडीचा जलवाहतूकीसाठी विकास करण्यात आला  आणि दुबई बंदराचे रूपांतर आंतराष्ट्रीय शिपिंग हब मध्ये करण्यात आले. यामुळे हे बंदर युरोप , मध्य पूर्व आणि आशिया यामधील व्यापाराचे मुख्य केंद्र बनले. आज जगातील १०० पेक्षा जास्त देशातील विविध कंपन्यांची ८००० पेक्षा जास्त कार्यालये दुबई मध्ये आहेत. यात भर म्हणून दुबई ला फ्री ट्रेड झोन म्हणून घोषित केले गेले. यामुळे आयातदार आणि निर्यातदार यांच्यासाठी दुबई हे महत्वाचे बंदर बनले. या नंतर दुबई ने आपले लक्ष पर्यटन उद्योगावर केंद्रीत केले. सोबत वित्तीय सेवा आणि संवाद साधने (communication industry) यावर लक्ष दिले गेले. यासाठी सगळ्यात महत्वाचे असे जागतिक दर्जाचे विमानतळ दुबई मध्ये बांधले गेले. यानंतर दुबई मध्ये अनेक पंचतारांकित हॉटेल चालू झाली. या सगळ्यामुळे ९० च्या दशकात दुबई ला फार महत्व प्राप्त झाले. पुढे इ. स. २००० नंतर shopping malls, underwater zoo, artificial islands, luxurious hotels, artificial reservoirs, man made flower gardens उभारली गेली. बुर्ज खलिफाच्या उभारणीनंतर दुबई हे जगाच्या नकाशातील आकर्षणाचे  स्थान झाले. दुबई मध्ये फिरायला, व्यापाराला जाणे , तिथे घर विकत घेणे हे प्रतिष्ठेचे समजले जाऊ लागले. यानंतर दुबई ने आपला मोर्चा वैद्यकीय यंत्रसामुग्री, वाहन उद्योग , एंजिनियरींग सेवा याकडे वळवला आणि तिथे सुद्धा दुबई ची प्रगती चालू आहे. दुबई बाबत बोलताना , 'माणूस आपल्या इछाशक्तीच्या जोरावर काय काय करू शकतो हे पहायचे असेल तर दुबई कडे पहा.' असे बोलले जाते. 



   ही झाली एक बाजू. आता दुसरी बाजू बघूया. या एवढ्या मोठ्या विकासासाठी दुबई कडे नैसर्गिक  स्रोत मर्यादित आहेत. वाळवंटामुळे वापरण्यायोग्य जमीन अतिशय कमी प्रमाणात आहे. स्वत:ची वाढती लोकसंख्या आणि दरवर्षी भेट देणारे लाखो पर्यटक याना सामावून घेणे दिवसेंदिवस दुबईला कठीण होत चालले आहे. या सर्व चंगळवादाला पोसण्यासाठी मानवी श्रम महत्वाचे आहेत. आणि हे श्रमजीवी मुख्य शहर सोडून इतर उपनगरीय भागात या देशात पैशाच्या आशेने विविध देशातून आलेले मजूर आहेत. 



   आणखी एक मुद्दा म्हणजे वाळवंटीकरणचा. ही पर्यावरणीय  ऱ्हासाची  नैसर्गिक  प्रक्रिया  आहे; यात सुपीक जमिनीचे रूपांतर वाळवंटात होते. एका अभ्यासानुसार इ.स. २००० ते इ.स २०२० मध्ये दुबई च्या सुपीक जमिनीपैकी ६०% जमिनीचे वाळवंटीकरण झाले आहे. जरी ही नैसर्गिक प्रक्रीया असली तरी  नैसर्गिक  स्रोत जसे की पाणी , माती यांचे शोषण अधिक प्रमाणात झाले की जमिनीचे रूपांतर  वाळवंटात होण्याचे  प्रमाण जास्त आढळते. दुबई मध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाच्या अति मानवी हस्तक्षेपामुळे  हा वाळवंटीकरणाचा वेग खूप आहे. सुपीक जमिनीची कमतरता ही अन्न धान्यासाठी इतर देशांवरील अवलंबित्व वाढवते. ह्यावर उपाय म्हणून दुबई मध्ये vertical farming चे प्रयोग चालू आहेत.



   विकासाची अवाढव्य कामे दुबई ला जगातील सर्वात वाईट Environmental footprints   (एखाद्याच्या नैसर्गिक स्रोतांच्या वापराच्या कृतीमुळे पर्यावरणावर होणारे मोजायचे परिमाण) देणारे  शहर म्हणून ओळख देते. हे टाळण्यासाठी तिथल्या शेख नी इ. स. २०१० मध्ये १० लाख नवीन वृक्ष लावून वाळवंट कमी करून सुपीक जमिन वाढवण्याचे ध्येय घेतले.पण तेथील वातावरणामुळे ही झाडे जगली नाहीत. याशिवाय दुबई च्या समुद्रामध्ये मातीचा भराव घालून मानव निर्मित बेटे उभारण्याचे आणि ती विकून पैसे कमवण्यासाठी ३ प्रकल्प आणले गेले.  या प्रकल्पांचा  प्रस्तावित खर्च  १० अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढा होता. ३ पैकी २ प्रकल्प जवळजवळ फसले आहेत. ही बेटे उभारताना लाखो घन मीटर माती आणि दगड समुद्राच्या पाण्यात घातले गेले. या कामा दरम्यान तेथील वातावरणाची , समुद्रातील जीवसृष्टीची भरपूर हानी झालेली आहे. पण एवढी निसर्गाची हानी करूनही स्थिर आणि कायमची बेटे उभारणे शक्य झालेले नाही.



   दुबई तील ८५% जनता ही बाहेरून स्थलांतरीत झालेली आहे. जास्त पैसा आणि कर बचत च्या लोभाने हे लोक इथे रहात आहेत. एवढ्या सगळ्या जनतेला आणि दरवर्षी येणार्या पर्यटकाना लागणार्या पाण्याची गरज तिथल्या नैसर्गिक पावसाने भागणे शक्य नाही. इथले वार्षिक पर्जन्यमान  १६० मिमी  आहे;  म्हणून तिथे साधारण २००२ पासून कृत्रिम पाऊस पाडण्याचे तंत्र वापरण्यात येते. यामध्ये ज्या ढगान्मध्ये किमान ४०% बाष्प आहे अशा ढगान्मध्ये विमानाच्या सहाय्याने सिल्वर आयोडाईड , पोटॅशियम आयोडाईड , ड्राय आईस अशी रसायने भरली जातात मग त्यातले बाष्प वाढून वाढीव पाऊस पाडला जातो. काही शाष्त्रज्ञांच्या मते  या रसायनांचा वातावरणावर आणि मानवी आणि पशू पक्षींच्या  जीवनावर वाईट परिणाम होतो. वातावरणात कार्बन डायऑक्साईड वाढणे , ओझोन वायूचा थर कमी होणे असेही दुष्परिणाम या रसायनांचे आहेत. मूळात पावसाचे प्रमाण खूपच कमी असल्याने पावसाचे पाणी निचरा करण्याची पुरेशी योजना दुबईत बनवलेली नाही आणि तीच आता या कृत्रिम पाऊस आणि वादळ यामुळे आलेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे आलेल्या पूराचे एक महत्वाचे कारण आहे .



   आतापर्यंत महाविद्यालयातील विद्यार्थ्याना , कॉर्पोरेट मधील नोकरदाराना , सगळीकडे एक आदर्श केस स्टडी म्हणून ' दुबईची प्रगती कशी झाली ?' याचे धडे दिले जायचे ; पण आता या पूराच्या प्रसंगातून आपण काही शिकणार आहोत की नाही? हे महत्वाचे आहे. विकास , प्रगती , पैसा , भरभराट याच्या आपल्या व्याख्या काय आहेत? आणि आपले पोट कधी भरणार आहे? आपण कुठे थांबणार आहोत की नाही? ह्यावर दुबईतच नाही तर समस्त मानव जातीने विचार करायची गरज आहे. सरासरी मानवी आयुष्य ७५ वर्षे धरले तर ही ७५ वर्षे आपण मालक असल्या सारखे ह्या पृथ्वीवर वावरतो. आपल्या नंतर पुढची पिढी इथे आलेली आहे आणि त्यानंतरही अनेक पिढ्या इथे येत रहाणार आहेत. त्यानासुद्धा आपल्यासारखेच जगायचे आहे. त्यानासुद्धा  नैसर्गिक स्रोत लागणार आहेत. त्यांच्यासाठी आपल्याला ही पृथ्वी चांगल्या स्थितीत ठेवायची आहे. निसर्ग , पंचमहाभूते ह्या कोणी व्यक्ती नाहीयेत की त्या आपल्याला समजावतील. आपण अत्ताच गांभीर्याने विचार करून निसर्गाला ओरबाडणे थांबवायचे आहे. नाहीतर Global warming मुळे दरवर्षीचा उन्हाळा हा मागील वर्षापेक्षा तीव्र आणि उपलब्ध पाणीसाठा हा  मागील वर्षीपेक्षा कमीच होणार आहे. अजून वेळ गेलेली नाही. निसर्ग आपल्याला वेळोवेळी इशारे देतोय ; अतातरी  सावध होवून कृती केली तर आपण वाचू शकतो आणि पृथ्वीला वाचवू शकतो .


- श्रीकृष्णार्पणमस्तू.

चैत्र शु एकादशी , दि: 19-04-2024