Saturday 23 March 2024

रणदीप हूडांचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' :- सर्वानी अवश्य पहावा.



  काल प्रदर्शित झालेला रणदीप हूडा यांचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर'  हा सिनेमा पाहिला. 
लहानपणापासून सावरकर हे खूप वेळा वाचलेले असले आणि त्यांचा सारा जीवनपट आपल्या समोर असला तरी  कोणीतरी नव्याने त्यांच्यावर आधारीत कलाकृती बनवतेय हे समजल्यापासून मन या दिवसाची आतुरतेने वाट पहात होते. चित्रपटाचे दिग्दर्शक , निर्माता  आणि अभिनेता या महत्वाच्या तीनही जबाबदारी पेलेणार्या अभिनेता रणदीप हूडा यानी एक चांगला चित्रपट बनवला त्याबद्दल यांचे कौतुक आणि अभिनंदन केलेच पाहिजे. अमराठी माणसाने सावरकर समजून घेणे , त्यांचा अभ्यास करणे , आणि त्यावर चित्रपट बनवून त्यात सावरकरांची भूमिका करणे हे अजिबात सोपे नाहीये. एका मुलाखतीत रणदीप यानी या चित्रपटासाठी त्याना त्यांचे घर गहाण ठेवावे लागल्याचे सांगितले आहे.

  सावरकरांचा जीवनपट केवळ तीन तासात पडद्यावर दाखवणे कठीण आहे. पण रणदीप नी आपले कसब पणाला लावून हे आव्हान स्वीकारले आहे आणि सावरकरांच्या जीवनातील प्रत्येक  महत्वाची बाजू दाखवण्याचाप्रयत्न केला आहे. सावरकरानी आयुष्यात सुमारे १४ वर्षांचा प्रत्यक्ष सश्रम कारावास आणि १३ वर्षे नजरकैद भोगली. अंदमानचा सश्रम कारावास काय होता ह्याचे  चित्रण प्रत्येक भारतीयाने बघणे गरजेचे आहे. मी स्वत: अंदमानची सावरकरांची कोठडी आणि तेव्हा देण्यात येणार्या शिक्षांची प्रारूपे प्रत्यक्ष पाहिली आहेत. ती रिकामी कोठडी बघूनच माझा मेंदू तेव्हा जड झाला होता. तिथे सावरकरानी ११ वर्षे छळ सोसला होता , तिथेच त्यानी कोलू ओढला होता , तिथेच त्यानी हाताने नारळ सोलले होते आणि तिथेच त्याना "कमला" काव्यसंग्रह स्फुरला होता. त्यानी देशासाठी हालअपेष्टा भोगल्या म्हणजे नक्की काय काय सहन केले असेल याची जाणीव ह्या चित्रपटातून येते. एका प्रसंगात भूक हरताळावर असलेल्या कैद्याशी बोलताना सावरकर म्हणतात ,  "अरे तुझ्या उपाशी मरण्याने कोणाला कसलाही फरक पडणार नाही ; क्रांतीची ज्वाला पेटती ठेवण्यासाठी साम , दाम , दंड , भेद याचा वापर करून जिवंत रहाणे आणि इथून बाहेर पडणे आणि परत इंग्रजांविरूद्ध जोमाने लढणे हे आपले ध्येय असले पाहिजे." दुसर्या प्रसंगात अंदमानमधील मुसलमान वॉर्डन छळकपटाने आणि धाकटपशाने हिंदू कैद्याना बाटवणे आणि त्यांना धर्मांतरीत करण्याचे प्रकार करी. यामुळे दु:खी झालेल्या हिंदू कैद्याला समजवताना सावरकर म्हणतात ,  "मुसलमान का खाना क्या, पुरा मुसलमान खाओगे फिर भी मुसलमान नहीं बनोगे! "
गांधी हत्येनंतर संपूर्ण देशात जी ब्राम्हण  विरोधी दंगल झाली ज्यात अनेक ब्राम्हणाना मारण्यात आले , त्यांची घरदारं लुटली गेली , त्यातच विनायकरावांचे धाकटे बंधू , नारायणराव यांची सुद्धा हत्या झाली,हेही चित्रपटात दाखवून अहिंसेचे तत्वज्ञान त्या काळात देखील  किती तकलादू होते यावर प्रकाश टाकला आहे. सावरकरांचे ' हिंदुत्व ' हे केवळ हिंदूंसाठी नसून सर्वसमावेशक होते. देशाची फाळणी कुठल्या परिस्थित झाली ? त्यामागे कोणाचे हट्ट होते ? फाळणी नंतर ५५ कोटी भारताने का दिले ? लाहोर ते ढाका अस रस्ता बनवायला कोण उत्सुक होते ? हे आणि असे अनेक प्रसंग आपल्याला आपले स्वातंत्र्य मिळताना किती चुका केल्या गेल्या आणि सावरकरांचे ऐकले असते तर त्या टाळत्या आल्या असत्या याची जाणीव करून देतात.

  जी व्यक्ती देश स्वतंत्र झाल्यावर देशाची पंतप्रधान व्हायला हवी होती त्याना दिल्लीच्या स्वतंत्र भारताच्या  पहिल्या ध्वजारोहणाचे साधे निमंत्रणही मिळाले नाही. तेव्हापासून आजपर्यंत सावरकराना या देशात सरकारी पातळीवर उपेक्षितच ठेवले गेले. त्यांच्यावर नको नको ते आरोप आजही केले जातात. त्यानी अंगिकारलेल्या विविध नितींवर टीका केली जाते. पण सावरकर किती द्रष्टे होते याची जाणीव ही काळच आपल्याला करून देतो. त्यांची तरूणाना सक्तीचे सैनिकी शिक्षण देण्याची कल्पना किती गरजेची होती हे आपल्याला १९६२ मध्ये चीनकडून मानहानीकारक पराभव स्वीकारल्यावर झाली. "देशाच्या सीमा या तलवारीच्या टोकाने आखायच्या असतात ; चरख्यावरच्या सूताने नाही" हे त्यांचे लिखाण किती महत्वपूर्ण होते आणि आपण किती दुर्लक्षित केले ते आज आपल्या सीमा पाहून लक्षात येते. दुर्दैवाने आज आपली एकही सीमा सुरक्षित नाही. राज्यकर्ते काळाच्या  पुढे विचार करणार्या सावरकरांचे ऐकत नाहीत आणि त्याचे फटके आपल्या देशाला-देशातील सामान्य जनतेला भोगावे लागतात.

   राजकीय दरबारी कायम उपेक्षित राहिलेले हे तेजस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तीमत्व समाजमनामध्ये मात्र कायम जागृत राहिले पाहिजे. आणि ती जबाबदारी आपली सर्वांची आहे. समाजमनाच्या दबावापुढे कुठलीही सत्ता झुकू शकते. आणि समाजमन घडवण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे. ऱणदीप हूडा यानी यानिनित्ताने जो प्रयत्न केला आहे त्याला आपण सर्वानी साथ दिली पाहिजे. हा चित्रपट घरातील लहानमोठ्या सगळ्या  सदस्याना घेउन बघितला पाहिजे. त्यावर घरी येउन चर्चा केली पाहिजे. सकाळी उठल्यापासून आपल्याला हव्या त्या कृती आज आपण सहजपणे करतो. कारण आज आपण स्वतंत्र आहोत.पण त्या स्वातंत्र्यासाठी आधीच्या पिढीने किती भीषण दिवस काढले आहेत, केवढा संघर्ष आणि पराकोटीचा त्याग केला आहे याची जाणीव आणि त्याबद्दल सदैव  कृतज्ञ राहिले पाहिजे. 

  चित्रपटातील  'कधीच कुठल्या कॉंग्रेस सदस्याला काळ्यापाण्याची शिक्षा का झाली नाही ?' हा सावरकरांचा प्रश्न आणि आयुष्यभर अहिंसेचे तत्वज्ञान सांगणार्या गांधींचा वध गोळी घालून होतो आणि आयुष्यभर सशस्त्र क्रांतीचा पाठपुरावा करणारे सावरकर मात्र प्रायोपवेशन करून देह त्याग करतात या दोन विसंगती आपल्याला  विचार करायला भाग पाडतात. 

- अनिकेत 
पिंपरी चिंचवड 
फाल्गुन शु १३ 
दि: २३-०३-२०२४

No comments:

Post a Comment